नंदुरबार : दहावीचा यंदा लागलेल्या ऑनलाईन निकालानंतर आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षातील गुणपत्रिका हाती पडण्याचे बाकी आहे. यंदा परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान करून निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टी.सी.काढण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तारीख आणि शेरा काय द्यायचा याकडे आता शाळांचे लक्ष लागून आहे.
शिक्षण विभागाकडून याबाबत काहीही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा देखील संभ्रमात आहेत. अनेक शाळांनी शाळा सोडल्याचे दाखले तयार करून ठेवले असून तारीख आणि शेरा हे कॅालम कोरे ठेवले आहेत. सुचना येताच ते कॅालम भरून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जाणार आहे. केवळ आदेशाची प्रतीक्षा आहे.
n दरवर्षी गुणपत्रिकेसोबतच शाळा सोडल्याचा दाखला देतो. परंतु अद्यापही गुणपत्रिकाच बोर्डाकडून आल्या नाहीत. दाखल्यावर शेरा लिहितांना, विद्यार्थ्यांची टक्केवारी, कोणत्या श्रेणीत उत्तीर्ण झाला हे लिहावे लागणार आहे. तारीख कोणती टाकायची याबाबत संभ्रम आहे. बोर्डाने गुणपत्रिका पाठविल्यानंतर सूचनाही येतील असे एका मुख्याध्यापकाने सांगितले.
n दहावीचा निकाल ऑनलाईन लागला. परंतु द्याप गुणपत्रिका वितरणाची तारीख आली नाही. शाळेचा दाखला देतांना गुणपत्रिकेवरील तारीख आणि शेऱ्यामध्ये उत्तीर्ण असे लिहावे लागणार आहे. परंतु याबाबत बोर्डाकडून अशा कोणत्याही सूचना आल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
n गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला सोबतच दिला जाणार आहे. शाळांनी सर्व तयारी करून ठेवली आहे. आता केवळ आदेशाची प्रतीक्षा आहे. यंदा पहिल्यांदाच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने आदेशाप्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पाडावी लागत आहे.