नंदुरबार : कोराेना महामारीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यातून या व्यवस्थेवर अवलंबून असलेले कर्मचारी विनावेतन काम करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक होऊ शकते या उद्देशाने सुरू केलेली एसटी माल वाहतूक सेवा नंदुरबार आगाराला बळ देणारी ठरली असून गेल्या वर्षात २४ लाख रुपयांचे भाडे वसूल केले आहे.
एसटीला मालवाहतुकीच्या रुपाने हा नवा रस्ता मिळाला असला तरी ही मालवाहतूक करणारे चालक मात्र खस्ताच खात असल्याचे दिसून आले आहे. एसटीची मालवाहतूक सेवा अधिक प्रबळ व्हावी यासाठी नुकतेच शासनाने त्या-त्या प्रशासनातील २५ टक्के माल वाहतुकीची कामे एसटीला देण्याचे सक्तीचे केले आहे. यातून एसटीला बुस्टर मिळणार आहे. दरम्यान मालवाहतुकीतून नंदुरबार आगाराला खूप मोठा लाभ झाला नसला तरी आगाराची गाडी वेगात सुरू आहे. दर दिवशी वर्दी मिळत असल्याने येथील पाचही ट्रक माल घेऊन रवाना होत आहेत. गेल्या वर्षात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर केवळ सहा महिन्यात २५ लाख रुपयांचे भाडे वसूल करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातही मालवाहतुकीला आगार वेग देत असून अधिकारी नियमितपणे व्यापाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.
ॲडव्हान्स मिळतो, पण सुलभ हप्त्याने कट होतो
कोरोनामुळे वेतन वेळेवर होत नसल्याने घरापासून लांब जाणारे चालक आर्थिक अडचणीत येऊ नयेत, यासाठी एसटी महामंडळाकडून त्यांना ॲडव्हान्स देण्याची तरतूद करण्यात आली आहे. साधारण दोन हजारांपर्यंतची रक्कम चालकांनी लगेच दिली जाते. परंतु ही रक्कम त्यांच्या वेतनातून सुलभ हप्त्याने कपात केली जाते.
लांबवर जाणाऱ्या चालकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवल्यास त्यांना रिलिव्हर म्हणून आणखी एक चालक सोबत पाठवला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला व्यापारी पसंती देत आहेत. नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या एका गाडीला किमान २० हजारांपेक्षा भाडे मिळते. यातून चालकांचे वेतन वेळेवर करण्यासाठी पैसे आगाराकडे सातत्याने जमा होत असल्याचे सांगण्यात आले.
तीन दिवसात परतीच्या प्रवासाची सोय
नंदुरबार आगारातून राज्यात माल घेऊन गेल्यानंतर परतीचा प्रवास करणे गैरसोयीचे झाल्याने चालकांचे गेल्यावर्षी हाल झाले होते. यातून आता वर्दी न मिळाल्यास तीन दिवसात चालकाने ट्रक सोडून परत यावे अशा सूचना आहेत. दुसऱ्या आगाराचा ट्रक मिळाल्यानंतर चालकांचा परतीचा प्रवास सुरू होतो. आगाराकडूनही वेळोवेळी चालकांसोबत संपर्क केला जातो.
नंदुरबार आगारातील मालवाहतूक वाढली असल्याने आगारातून आणखी १५ ट्रक तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतरही या वाहतुकीला सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षात २४ लाख रुपयांची कमाई
नंदुरबार आगारातून २०२० या वर्षात ५५ हजार किलोमीटरचा प्रवास करून मालवाहतूक ट्रकांनी केला होता. यातून २४ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली होती.
२०२१ या वर्षातही एसटीची मालवाहतूक सेवा सुरूच ठेवण्यात आली. यातून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात ४ लाख १० हजार रुपयांची वसुली झाली असून ट्रक सुमारे ८ हजार ३०० किलोमीटर फिरल्याची माहिती आहे. मे महिन्याही वाहतूक सुरू आहे.
आगारातून निरोप आल्यावर नियमितपणे माल वाहतुकीला जात आहे. गेल्या वर्षात आलेल्या अडचणींमुळे यंदा काम करण्याची भीती होती. अद्यापतरी अडचणी आलेल्या नाहीत.
-चालक, नंदुरबार आगार
प्रवासी वाहतूक बंद असल्याने ट्रक चालवून भागत आहे. गेल्या वर्षी बाहेरगावी अडकून पडल्याने कुटुंबांचे हाल झाले होते. यंदा मात्र स्थिती व्यवस्थित असल्याने काम सुरू आहे.
-चालक, नंदुरबार,
नंदुरबार आगारातून नियमित मालवाहतूक सुरू आहे. यातून आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. येत्या काळात आगारातून आणखी ट्रक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदाही वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. चालकांना वेळेवर वेतन देत आहोत.
-मनोजकुमार पवार,
आगारप्रमुख, नंदुरबार