लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : आदिवासींमधील मौखिक अख्यायिकांप्रमाणे आदिवासींचे दैवत राजापांठा यांच्याद्वारे आत्मसात केलेली गुणकारी तथा आयुर्वेदिक मोहाची दारू कालपरत्वे रसायनयुक्त झाल्याने मानवी शरीरास अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीची गरज भासू लागली आहे. त्यानुसार नर्मदानगर ता. तळोदा येथील ग्रामस्थांनी व्यसनमुक्त गावाचा निर्धार केला. याबाबत चळवळ सुरू करण्यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे.नर्मदानगर येथील सामाजिक कार्यकर्ते दरबारसिंग पाडवी हे व्यसनमुक्तीचा उपक्रम घेत आहे. यात शेकडो व्यसनाधीन वयस्क स्त्री-पुरुष व युवक सहभागी होत आहे. वर्षानुवर्षे व्यसनाधितेत जोखळलेल्या असंख्य आदिवासी कुटुंबाचे या उपक्रमांमुळे परिवर्तन झाले असून व्यसनमुक्त व सुखी संसार सुरू आहे. पूर्वजांच्या मान्यतेनुसार विविध रोगावर उपायकारक असलेली मोहाची दारू ही कालपरत्वे रासायनिक युक्त झाल्याने मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरत आहे. केमिकलयुक्त दारूच्या आहारी गेलेल्या असंख्य तरुणांमुळे गावात अशांतता पसरत वाद विवादाच्या घटनेत भर पडली आहे. तर नशेत वाहन चालवल्याने अपघाताचे प्रमाणातही वाढ झाली आहे. शिवाय संपूर्ण पिढीच बेकारीच्या खाईत अप्रत्यक्षपणे ढकलली जात असुन ही बाब समाजासाठी चिंतेची बनली आहे.व्यसनाच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी नर्मदानगर येथील ग्रामस्थानी बैठक घेत व्यसनमुक्त गावाचा संकल्प केला. यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली असून व्यसनमुक्तीसाठी पुढे उपक्रम राबविण्यात येणार आहे. बैठकीत समिती प्रमुख दरबारसिंग पाडवी, सरपंच पुन्या वसावे, माजी सरपंच दिलीप पाडवी, पोलीस पाटील जयराम पाडवी, टेडग्या पाडवी, किरता वसावे, रोता पाडवी, सुरेश चौधरी, उमेश पाडवी, राजू पाडवी, देवानंद पाडवी, लालसिंग पावरा, दोरुसिंग वसावे, वजा पाडवी, सिंगा वसावे आदी उपस्थित होते.दारूच्या आहारी गेलेल्यांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय झाली असून एका व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर येत आहे. शेती असूनही उपजीविकेसाठी पाल्यासह स्थलांतर करीत आहे.स्थलांतराने कुटुंबाचे पालनपोषण होत असले तरी कुटुंबियांना सामाजिक, आर्थिकसह बेरोजगारी, आरोग्य, पाल्याचे शिक्षण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते.शिवाय संपूर्ण पिढीच बेकारीच्या खाईत अप्रत्यक्षपणे ढकलली जात असुन ही बाब समाजासाठी चिंतेची बनली आहे.व्यसनामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत असतांना पोलीस प्रशासन मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर अवैध धंदे वाढीला काही अंशी पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचेही म्हटले जात आहे.
व्यसनमुक्त गावासाठी एकवटले ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:31 IST