नंदुरबार : राज्याच्या इतर विभागात धो-धो कोसळत असलेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारे जल प्रकल्प निम्म्यावर आले असून, प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जूनपासून आजअखेरपर्यंत एकूण सरासरी १५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत १०० टक्के पाऊस कोसळला आहे. यातून जलप्रकल्पांमधील पाणीसाठा हा मुबलक असल्याने पाणीटंचाई तसेच भूजलपातळी समाधानकारक होती. यंदा सात जूनरोजी पाऊस येणार, अशी अपेक्षा होती. परंतु पाऊस लांबत गेला. आजअखेरीस जिल्ह्यात ३१.७ टक्के पाऊस झाला असून, हा पाऊस गेल्यावर्षाच्या तुलनेत निम्माही झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मध्यमप्रकल्प सुस्थितीत असले, तरी लघु प्रकल्पांची स्थिती दयनीय झाली असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत पावसाळा सुरू राहतो. येत्या काही दिवसात पावसाची टक्केवारी वाढेल, असा अंदाज असला, तरी नद्यांच्या उगमस्थानी अद्यापही दमदार पाऊस नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणी नाही. केवळ सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज हे यासाठी अपवाद असून, येथील उघडलेले दरवाजेही बंद करण्यात आले असल्याने येथील पाणीसाठा सुस्थिती असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
१२ लघुप्रकल्प निम्मे
जिल्ह्यात एकूण ३६ लघु प्रकल्प आहेत. यातील १२ प्रकल्प हे निम्म्यावर आले आहेत. यात मेंदीपाडा, देवळीपाडा, ढोंग, रंकानाला, अमरावतीनाला, चाैपाळे, घोटाणे, सुसरी, नेसू, चिरडा, धनपूर व भुरीवेल या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या एकूण ५०.६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी
जिल्ह्यातील ३७ लघु प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी २३.०४ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा केवळ १४ टक्के आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत पाणी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
लघु प्रकल्पांचे पाणी प्रामुख्याने पाटचा-यांमधून शेतक-यांना सिंचनासाठी दिले जाते. यातून रब्बी हंगाम सुकर होता. यामुळे पावसाची प्रतीक्षा आहे.
बॅरेज प्रकल्पाचे दरवाजे बंद : हतपूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरजचे दरवाजे उघडले जातात. दोन आठवड्यांपूर्वी हे दरवाजे उघडले गेले होते. परंतु शेतक-यांनी बॅरेज प्रकल्प कार्यालयांना संपर्क करुन हे दरवाजे बंद करण्यासाठी पाठपुरावा केल्याने पाणी सोडणे थांबवण्यात आले आहे.
जिल्ह्यात येत्या पाच दिवसांतही हलक्या स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. येत्या काळात मुसळधार अशी पावसाची शक्यता नाही. यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.
- सचिन फड, हवामानतज्ज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, नंदुरबार.
सात मध्यम व बॅरेज प्रकल्प व ३७ लघुप्रकल्प असे एकूण ४५ प्रकल्प जिल्ह्यात आजघडीस आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण ३२४.३४ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या उपलब्ध आहे. सरासरी ३९.६५ टक्के हा साठा आहे. या साठ्यात वाढ होण्यासाठी पावसाची गरज आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी जुलैमध्यपर्यंत सात मध्यम प्रकल्प हे ९० टक्के भरले होते. ऑगस्टमध्ये बहुतांश प्रकल्प १०० टक्के होऊन काही ठिकाणी ओव्हरफ्लो झाले होते. यंदा मात्र जुलै संपण्यात येऊनही पाऊस नसल्याने प्रकल्पांची पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा लागून आहे.