लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा शिवारात अज्ञात माथेफिरुने पपईची २० ते २५ झाडांची कत्तल केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून पोलिसांनी अशा माथेफिरुंचा तपास करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.सारंगखेडा शिवारातील जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात चार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. या पपईच्या शेतात अज्ञात माथेफिरुने सुडबुद्धीने फळे असलेल्या २० ते २५ झाडांची कत्तल करून शेतकऱ्याचे नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत या शेतकऱ्याने सारंगखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यावरून सारंगखेडा पोलीस तपास करीत आहेत. गेल्यावर्षीही या शेतकऱ्याच्या शेतात चार ते पाच महिन्यांची वाढ झालेल्या २० ते २५ पपईच्या झाडांची कत्तल केली होती. आता मात्र फळे पक्व झालेल्या झाडांची कत्तल करून नुकसान करण्यात आले आहे. आधीच पपई पिकाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात माथेफिरुंकडून अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक ठाणसिंग राजपूत हे करीत आहेत.दरम्यान, शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या अज्ञात माथेफिरुंचा पोलिसांनी शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सारंगखेडा शिवारात पपईच्या झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:05 IST