नवापूर शहरातील २४ पोल्ट्री फॉर्ममध्ये लाखो कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली आहे. बर्ड फ्लूग्रस्त परिसरातील पोल्ट्रीत निर्जंतुकीकरण करण्याचे काम काही व्यावसायिकांनी सुरू केले आहे. तर काही व्यावसायिकांनी निर्जंतुकीकरणाचा कामाला अजून सुरुवात केलेली नाही पोल्ट्री फार्ममधील पडलेल्या विष्ठेत पाणी साचल्याने विष्ठा कुजते, किडे पडतात. ते खाण्यासाठी बगळे, कावळे इतर पक्षी येत असतात. त्यातून इतर पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. या संदर्भात पोल्ट्रीतील विष्ठा पडलेल्या भागामध्ये जाळीने पूर्ण बंदिस्त करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ म्हणतात; परंतु काही पोल्ट्रीत जाळ्या नादुरुस्त अवस्थेमध्ये दिसून आले आहेत. तेथे पक्षी शिरतात. त्यापासून धोका होऊ शकतो. प्रशासनाचे किलिंग ऑपरेशनाचे काम झाले असेल तरी योग्य उपाययोजनांबाबत पोल्ट्रीत व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.
नवापूर परिसरातील पोल्ट्रीतील लाखो कोंबड्या नष्ट करण्यात आले असेल तरी १० किलोमीटर त्रिज्येतील तालुक्यातील करंजी खुर्द, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, एक किलोमीटरमधील गाव,जामने, जामतलाव, घोडजामने, कोठडा, काळंबा, मावचीफळी, किलवणपाडा, तीन किलोमीटर अंतरावरील गाव नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी पाच किलोमीटर अंतरावरील गाव, रायंगण, रायपूर, बोकळझर, पायरविहीर, गडद, बिलमांजरे बंधारपाडा, आमपाडा या १० किलोमीटर त्रिज्येतील गावातील देशी कोंबडी बदक व इतर पक्षी टप्प्याटप्प्याने जमा करण्यासाठी केवळ पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दवंडी फिरवण्यात आली होती. पुढे ग्रामीण भागात काय करवाई होईल, याबाबत संभ्रम कायम आहे. ग्रामीण भागातील ग्रामसेवक व तलाठी यांची टीम तयार करण्यात आली होती. ग्रामीण भागात कोंबड्यांची मरतूक नाही आहे. कोंबड्या जमा व नष्ट करू नका असे सांगण्यात आले होते. तूर्त ग्रामीण भागातील पक्षी संकलनदेखील थांबण्यात आले आहे. पुढे शासन काय निर्णय घेते हे नंतरच कळले. २००६ मध्ये नवापूर शहरातील पाळीव पक्षी पोपट, कबुतर व इतर पक्षी जमा करण्यात आले होते. यंदा मात्र या पक्ष्यांबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.