सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावाच्या पश्चिमेला अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्ग व विसरवाडी-सेंधवा राष्ट्रीय महामार्गाला लागून एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा सिमेंट, खडी, वाळू मिक्सर प्लांट सुरू आहे. हा प्लांट अगदी बसथांब्याजवळ आहे. याठिकाणी बाजारपेठ असून लागून नवीन वसाहत झाल्याने घरे आहेत, तसेच या परिसरात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. प्लांटच्या दक्षिणेला जवळच प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. प्लांटमधून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. या धुराचा परिसरातील रहिवासी, प्रवासी, व्यापारी, विद्यार्थ्यांना त्रास होतो. संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाला वेळोवेळी प्लांट बंद करण्याबाबत विनंती करूनही आजतागायत चालू आहे. त्यामुळे प्रदूषण होऊन परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामस्थांबरोबर जीवसृष्टीलाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे हा प्लांट तत्काळ बंद करून गावपासून लांब ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागाणी ग्रामपंचायत, तहसीलदार शहादा, उपविभागीय अधिकारी शहादा व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर हरी दत्तू पाटील, बाबूराव माळी, शरद पाटील, दिलीप चौधरी, हिरालाल महाजन, योगेश महाले, शेख शोएब, पावबा कोळी, दीपक सोनवणे, भरत चौधरी, अंबालाल पाटील, मुरलीधर पाटील, सदानंद पाटील, रमेश चौधरी, अशोक पाटील, प्रकाश चौधरी, विठ्ठल चौधरी, भगवान पाटील, पुरुषोत्तम पाटील, शरद चौधरी, जगदीश सोनवणे, शांताराम भोई, महेश चौधरी आदींसह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
दरम्यान, वारंवार तक्रार करूनही जर वरिष्ठ दखल घेत नसतील तर लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही प्रकाशा येथील नवीन वसाहतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी दिला आहे.