नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे सराफा व्यावसायिक रसातळाला आला आहे. कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. सराफा दुकानेही बंद असल्याने गोरगरीब, गरजूंना पैशांची गरज असल्याने ते मोड देण्यासाठी फिरतात. पण प्रशासनाच्या आदेशानुसार, दुकाने बंद असल्याने आपणही हतबल असल्याची भावना सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
दोन हजारावर कारागिरांचे हाल-सुनील सोनार
नंदुरबार शहरात सराफांची सुमारे १०० दुकाने असली तरी सराफा व्यावसायाशी अनेक घटकांचा संबंध येतो. एखादा दागिना बनवायचा म्हटला तर त्याच्याशी संबंधित अनेक कारागीर असतात. अशा जवळपास दोन ते तीन हजार कारागिरांचा या व्यवसायात हातभार लागला आहे. हे सर्व कारागीर गरीब आहेत. त्यातही चांदीचे काम करणाऱ्या कारागिरांचे ‘बंद’मुळे हाल होत आहेत. यात बंगाली कारागिरांचाही समावेश आहे. गत ११ दिवसात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली, असे नंदुरबार शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सुनील प्रल्हाद सोनार यांनी सांगितले.
सराफा दुकानांनाही सवलत द्यावी-मनोज सराफ
सराफा व्यवसाय हा कोरोना स्प्रेडर नाही. दुकानांमध्ये मोजके लोक असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या व्यावसायिकांसाठी इतरांप्रमाणे आठवड्यातील चार दिवस दररोज चार ते पाच तास दुकाने उघडी ठेवण्यासाठी सवलत द्यावी. सध्या कोरोना काळात गरजूंना पैशांची गरज भासते. अनेक गोरगरीब आपल्याकडील सोन्या-चांदीचा दागिना मोडून पैशांची गरज भागवतात. परंतु नेमका सराफा व्यवसाय बंद असल्याने ते सराफा बाजारातून परत जात आहेत. बंदमुळे दुकाने उघडी करून त्यांची मोडही स्वीकारू शकत नाही व त्यांची गरज भागवू शकत नाही, याचे वाईट वाटते. यासाठी प्रशासनाने सराफा व्यावसायिकांनाही सवलत द्यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज दीनानाथ सराफ यांनी केली आहे.