नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. पहिल्या टप्प्यातील लाटेत ५० पेक्षा अधीक वयोगटातील रुग्ण होते तर दुसऱ्या लाटेत थेट २५ ते ५० वर्ष वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. काही प्रमाणात बालकेही बाधीत झाली असल्याने चिंता वाढली आहे. याशिवाय मृत्यूचा वयोगटही बदलला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अवघ्या ५२ दिवसात तब्बल सव्वा पाच हजार रुग्ण वाढले आहेत. तर ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या लाटेचा कोरोना वेगाने पसरत आहे. फेब्रुवारीपासून दुसरी लाट गृहीत धरली जात आहे. अर्थात त्यासाठी ५२ दिवसांचा अवधी गृहीत धरला जात आहे. तब्बल सव्वापाच हजार रुग्ण या कालावधीत आढळून येणे ही बाब चिंताजनक आहे. विशेष म्हणजे मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. त्यातल्या त्यात कोरोनाने सर्वच वयोगटाला विळख्यात घेतले आहे.
तरुणांचा समावेश यात सर्वाधिक दिसून येत आहे. पहिल्या लाटेत तरुणाई कोरोनापासून दूर होती. परंतु दुसऱ्या लाटेत तिला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्याला विविध कारणे कारणीभूत असली तरी मुख्य कारण म्हणजे लग्न समारंभ, बाजारातील गर्दी, महाविद्यालयांमधील उपस्थिती या बाबी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. काही भागात बालकेही बाधीत होत आहेत.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत अर्थात फेब्रुवारी ते आतापर्यंत जे ५५ मृत्यू झाले आहेत त्यांचा सरासरी वयोगट हा ४५ ते ७० असा आहे. पहिल्या लाटेत एकुण मृत्यू पैकी ८० ते ८५ टक्के मृत्यू हे ६० पेक्षा अधीक वयोगटातील होते. आताचा मृत्यूदर हा कमी वयोगटाचा असल्यामुळे चिंता वाढली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांचे प्रमाण देखील कायम आहे. ही बाब लक्षात घेता तरुणांनी आता स्वत:ला जपणे आवश्यक आहे. आधीच तरुणाई कोरोना बाधीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात ही चिंता निर्माण झाली आहे.
चाचण्या वाढविल्या
n कोरोनाच्या चाचण्या गेल्या महिनाभरात वाढविण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर सोबत रॅपीड ॲण्टीजनच्या चाचण्या देखील केल्या जात आहेत. विशेषत: नंदुरबार, शहादा शहरात अशा चाचण्या वाढविल्या असून त्यातून बाधीतांची संख्या सर्वाधिक दाखविली गेली आहे. दररोज आढळून येणाऱ्या एकुण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण हे रॅपीड ॲण्टीजन चाचणीतून आढळून आलेले आहेत. त्यामुळे रुग्ण शोधण्यासाठी ही चाचणी सद्या प्रशासनाच्या दृष्टीने मोठा आधार ठरली असल्याचे चित्र आहे.
अशी वाढली दुसऱ्या लाटेची आकडेवारी...
n जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी एकुण कोरोना रुग्णसंख्या ही ८, ८३१ इतकी होती. ती २४ मार्च रोजी १४, ०८९ इतकी झाली आहे. तब्बल ५,२५८ इतके रुग्ण या ५२ दिवसात वाढले आहेत. गेल्या दहा दिवसात रुग्ण संख्या दररोज किमान ३०० ते ६००पर्यंत जात आहे. त्याला विविध कारणे असली तरी ही लाट रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.