शहादा : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात १५ एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या संचारबंदी कालावधीत जिल्ह्यातील सर्व आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक यांनी पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांना कळवले आहे. जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. ती कमी करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा पालिका क्षेत्र तसेच अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात १५ एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी, रविवारी कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. या चर्चेअंती जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक १५ एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी सकाळी सहा ते रात्री बारा (संचारबंदी कालावधीत) या कालावधीत बंद ठेवण्यात येत असल्याचे पत्र जिल्ह्यातील नंदुरबार ,शहादा, अक्कलकुवा, नवापूर आदी सर्व आगारप्रमुखांना देत वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश राज्य परिवहन, धुळे विभागाचे नियंत्रकांनी दिले आहेत.
या दोन दिवसांत एस. टी.चे मोठे नुकसान होणार असले, तरीही कोरोनाला रोखण्यासाठी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे निर्धारित करुन कामकाज बंद ठेवणार असल्याचे एस. टी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.