लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील धायटे व विसरवाडी परिसरासाठी वरदान ठरणाºया नागन मध्यम प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी व सामान्य जनता सुखावली आहे.१९८२ पासून निर्माणाधीन असलेला तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्प सातत्याने चर्चेत राहिला आहे. प्रकल्पाच्या मंजुरीच्या समयी असलेला प्रकल्पाचा खर्च प्रकल्पाचे काम रखडल्याने पूर्णत्वास येईपावेतो दहा पटींनी वाढला हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वितरीकांचे रखडलेल्या कामामुळे पुन्हा प्रकल्प चर्चेत आला होता. प्रकल्पाच्या उभारणीतील अडचणींवर मात करुन प्रकल्पात गेल्या तीन वर्षापासून पाण्याचा साठा होत असल्याने प्रकल्पाच्या लाभदायक क्षेत्रातील शेतकरी व सामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विसरवाडी व धायटे परिसरातून प्रकल्पाचे पाणी थेट नवागावपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. अनेक पाणीपुरवठा योजनांची मदार प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीच्या सिंचनासह जनावरांच्या पाण्याची भिस्तदेखील त्याच पाण्यावर आहे. तालुक्यातील धायटा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी धोक्यात आली होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेल्याने चिंता वाढल्या होत्या. मे महिन्यात उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पाहता प्रशासनाने प्रकल्पातून आवर्तन सोडल्याने जनतेला हायसे झाले आहे.
नागण प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:15 IST