लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या कृषी योजनेंतर्गत पाचोराबारी येथील ५६ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २३ लक्ष रुपये वीजबिल थकबाकी भरून योजनेत सहभाग नोंदविला आहे. या वेळी ५० टक्के वीजबिल सुटीचा लाभही या शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती महावितरणचे ग्रामीण एक उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांनी दिली.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषी योजना २०२० अंतर्गत शेतकऱ्यांना थकीत वीजबिलावर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. त्यानुसार, पाचोराबारी येथील ५६ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी पवार यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी वीजबिल योजनेची माहिती दिली. योजनेंतर्गत चालू महिन्याचे वीजबिल भरून थकबाकीच्या योजनेवर ५० टक्के सुटीसह सहभाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. यानंतर सर्व ५६ शेतकऱ्यांनी मिळून त्यांच्याकडील लाभाची थकबाकी वजा जाता एकाच दिवशी २३ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे करून या योजनेचा लाभ घेतला. तसेच जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या वीजबिलाची माफी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सहायक अभियंता राजीव रंजन, कनिष्ठ अभियंता रामेश्वर चव्हाण, प्रगतशील शेतकरी अल्पेश पटेल व इतर उपस्थित होते.