नंदुरबार : सदाभाऊ खोत यांची आकलनक्षमता कमी आहे. त्यामुळेच त्यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टिका केल्याचे सांगत ईडीचा वापर केंद्र सरकार विरोधकांना छळण्यासाठी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील सोमवारी नंदुरबारात आले होते. पत्रकारांशी बोलतांना पाटील म्हणाले, विरोधकांना छळणे आणि त्या माध्यमातून आपले राजकीय इप्सीत साध्य करण्यासाठी सद्या केंद्र सरकार ईडीचा वापर करीत आहे. परंतु विरोधक त्याला घाबरणार नाहीत. माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्यावर ट्वीट करीत टिका केली होती. त्यावर बोलतांना पाटील म्हणाले, क्रिकेट आणि कब्बडीत पवार यांचे काय योगदान आहे हे सदाभाऊ यांना माहित नसावे. त्यांची आकलन क्षमताच कमी असल्याचे हे उदाहरण असल्याचे सांगत त्यांच्या टिकेला एव्हढे महत्त्व पक्ष देत नसल्याचे सांगितले.
तापीवरील २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचा सुधारीत प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पक्षातील गटबाजीबद्दल त्यांनी जास्त बोलणे टाळले, मोठ्या पक्षात थोडेफार रुसवेफुगवे असतातच त्यात काही नवीन नसल्याचे त्यांनी सांगितले.