पावसामुळे पूरक उद्योगांना गती
नंदुरबार : दडी मारलेल्या पावसाने हजेरी दिल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे. यात गेल्या दोन दिवसांपासून पावसावर आधारित उद्योगांनाही गती आली आहे. रेनकोट, छत्री, पावसाळी बूट यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा वृक्ष लागवडीची चळवळ थंडावली
नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत अनेकविध उपक्रमांना ब्रेक लागला आहे. यात वृक्षारोपणाचाही समावेश असून पावसाळ्यात होणारे वृक्षारोपण सध्या थांबले आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्याकडूनही यंदा वनमहोत्सव होण्याची शक्यता कमीच आहे. तसेच शाळा बंद असल्याने शाळांच्या आवारात तसेच मोकळ्या जागांवर वृक्ष लागवडीच्या कामांना ब्रेक देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील काही भागात दूषित पाणी
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी योजनांमधून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पावसाळा सुरु झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देत जनजागृती करण्याची मागणी आहे.
तळोदा तालुक्यात बसफेऱ्या हव्यात
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात एसटीच्या बसफेऱ्या वाढविण्याची मागणी आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात बसच्या फेऱ्या कमी अधिक प्रमाणात सुरु होत्या. यातून प्रवाशांचे हाल होत असल्याने बस सुरु करण्याची मागणी आहे.
नवोदयची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी होणार
नंदुरबार : जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. बदललेल्या तारखेनुसार ११ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. तरी परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन प्रिंट करुन घेता येणार आहे, तशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य के.बी.बन्साेड यांनी दिली आहे.
रांझणी परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा संचार
रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा संचार वाढला आहे. या भागात अस्वल, तरस आणि बिबट्या दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
अक्कलकुव्यात सफाईकडे दुर्लक्षच
अक्कलकुवा : शहरातील विविध भागात साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. ग्रामपंचायत याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नंदुरबार परिसरात विजेचा लपंडाव सुरु
नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली, वाघोदा व पातोंडा शिवारातील वसाहतींमध्ये वीजपुरवठ्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरु असून वीज कंपनीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पर्यटन स्थळांवर पोलीस गस्त करावी
धडगाव : दुर्गम भागात पाऊस कोसळत असल्याने हाैशी पर्यटक या भागात भेटी देतात. या पार्श्वभूमीवर बिलगाव परिसरातील धबधबे तसेच चांदसैली घाटात पोलीस गस्त सुरु करण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षात धबधब्यांवर अप्रिय घटना घडल्या आहेत.