लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून कोळदा ते खेतिया रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शहादा ते खेतीया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या वळणावर कच्चा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता पहिलाच पावसात खचल्याने कामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान यामुळ वाहतुकीलाही अडथळा ठरत आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोळदा ते खेतियारस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील काही भागात रस्तादेखील पूर्ण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याच मार्गावरील शहादा ते खेतीया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळी वळणावरील रस्त्याचे काम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून बंद पडले होते. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्य लॉकडाऊन करून सर्व क्षेत्रातील बांधकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातच लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. यानंतर सुसरी धरण वळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. रस्ता रूंदीकरण तसेच उंची वाढवण्यासाठी माती मिश्रित मुरूम टाकून भराव करण्यात आला. परंतु हा भराव पाहिल्याच पावसात खचून गेल्याने सुरू असलेला रस्ता दर्जेदार होईल का? असा प्रश्न चिन्ह नागरिकांसह वाहनधारकांमध्ये उपस्थित केला जात आहे. तरी या मार्गावरील भराव योग्य पद्धतीने करून रस्ता दर्जेदार करण्याची अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.दरम्यान संबंधितांनी पावसाळा सुरू होण्याआधीच या मार्गावर तातडीने उपाय योजना करून या मार्गावरील पुढील धोका टाळण्याकरीता तातडीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांकडूनही व्यक्त केली जात आहे.
मध्यप्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग असून, या मार्गावर नेहमी वाहनाची वर्दळ असते. या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता भरावासाठी माती मिश्रित मुरूमाचा वापर करण्यात येत आहे. हा माती मिश्रित मुरूम पावसाळा सुरू होताच खचण्याची भीती अधिक आहे. तसेच या रस्त्याच्या आजू बाजूस मोठ्या प्रमाणावर खड्डा असल्याने रस्ता खचून अपघात होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.