लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : देशभरात डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसायही यातून सुटला नाही. डिझेलचे दर वाढले आणि शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दरही वाढल्याने पिकांसाठी होणारा खर्च व शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवत असे. बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही, असे समीकरण तयार झाले होते. बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले अन् शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला. मागील दशकापासून शेतीत आमूलाग्र बदल झाला. चार दिवसांची कामे एक तासात व्हायला लागली, एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटा फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचाला, अंग मेहनत वाचली मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला. आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी कामांचे दर वाढवले, डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढले आणि पर्यायाने शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. ट्रॅक्टरची मशागत शेतकऱ्यांना आज परवडणारी नसली तरी काळानुरूप बैलांच्या मदतीने शेती करणेही आज तरी माणसाला शक्य नाही. यासाठी शेतीला पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण गरजेचे आहे.सद्य:स्थितीतील शेती मशागतीचे दर असे (प्रती एकर) : नांगरणी एक हजार ८०० रुपये, रोटा मारणे दोन हजार रुपये, फणणी एक हजार ६०० रुपये, वाफे तयार करणे एक हजार ६०० रुपये रन, सरी पाडणे एक हजार रुपये याप्रमाणे दर आहेत.
धावपळीच्या युगात शेतीची कामे लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. आज जवळपास सर्व शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेती करतात. परंतु डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मशागतीचेही दर वाढले आहेत. शेतीचे उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. शासनाने शेतीच्या कामासाठी वापरत असलेल्या अवजारांना मिळणारे डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.-सुनील कोळी, शेतकरी, तोरखेडा, ता.शहादा