मार्च महिन्यात शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाल्याने तसेच मृत्यूदर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चाचणी करण्याबाबत स्वयंस्फूर्तीने उत्साह निर्माण झाला असून या पाचही केंद्रांवर दिवसभरात मोठ्या संख्येने नागरिक स्वतःची चाचणी करून घेत आहेत.
या चाचणी केंद्रांवर नमुने दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अहवाल प्राप्त होत आहे. ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशांना चाचणी केंद्रावरच औषधीचा पुरवठा करण्यात येत असला तरी अशा रुग्णांना होमक्वारंटाईनचा शिक्का मारण्यात यावा, त्यानंतरच त्यांना घरी उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. या चाचणी केंद्रांवर ज्या नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशांच्या संपर्कातील इतरांची चाचणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जे बाधित रुग्ण शासकीय नियमांचे पालन करणार नाही अशांना सक्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी उद्भवलेल्या कोरोना संक्रमणाच्या तुलनेत यंदाचे संक्रमण अत्यंत घातक असल्याचे गेल्या महिन्यात सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती तर यंदा मार्च महिन्यात अचानक मृत्यूदर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या चाचणी केंद्रांवर बालकांची तपासणी केली जात आहे. १० ते २० वर्षीय बालकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह येत असल्याने शहर व परिसरात कोरोनाच्या नेमक्या कुठल्या स्ट्रेनचे संक्रमण सुरू आहे याबाबत उच्चस्तरीय विशेष तपासणी करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.