जिल्हातील या ११ ग्रामपंचायंतीची विकासकामे प्रगतपथावर असताना मध्येच या विभागाच्या प्रमुखांनी सबंधित ग्रामपंचायतींना उर्वरीत रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ५ ग्रामपंचायतींकडे सुसज्ज कार्यालय नसल्याने याठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उभारणी करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, या विकासकामांचा निधीच परत मागितल्याने विकासकामे रद्द करावी लागली आहे. जिल्हा परिषेदेने विकासकामेच रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे खर्च केलेला पैसा वाया जाणार आहे. ग्रामपंचायतीचे विकासकामांवर जवळपास तीन लाख रुपये खर्च केले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ही विकासकामे का रद्द केली, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेअंतर्गत दिलेल्या निधीत तळोदा तालुक्यातील तळवे, चिनोदा, नवापूर तालुक्यातील चिखली, धडगाव तालुक्यातील राडिकलम, चोंदवाडे या पाच ग्रामपंचायतीने गावात स्मशानभूमीची कामे हाती घेतली होती. कारण तेथे स्मशानभूमी नसल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. तळवे व चिनोदा येथील गावकऱ्यांना गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा येथील स्मशानभूमीत जावे लागत आहे. साहजिकच शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या प्रश्न मार्गी लागणार होता. शासनाकडून ज्या गावात स्मशानभूमी नाहीत त्या ठिकाणी उभारणीसाठी प्राधान्य दिले जात असताना, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने थेट कामच रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा परिषदेकडून ११ गावांतील विकासकामांचा निधी मागविला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST