गेल्या तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील अनेक नदी, नाले प्रवाही होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची अशीच संततधार राहिल्यास जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे निर्माण झालेले संकट दूर होण्याची आशा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील पहाडी क्षेत्रात अधिक आहे. त्यामुळे डोंगर उतारावरून येणाऱ्या नाल्यांमुळे सपाटीवरील नद्या व नालेही प्रवाही होत आहेत.
दरम्यान, कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्यातील सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतजमिनीत योग्य वाफसा झाल्यानंतरच पेरणी करावी असाही सल्ला या केंद्रातर्फे देण्यात आला आहे.