तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावासह तालुक्यात शनिवारी दुपारी व रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने, ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. पाऊस नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
तोरखेडा गावासह परिसरातील बामखेडा, वडाळी, सारंखेडा आदी गावांच्या शिवारात मृग नक्षत्राच्या अगोदर झालेल्या पावसानंतर तुरळक पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी पाऊस पडेल की नाही, या चिंतेत होता. दरम्यान, त्यानंतर पडलेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीतील ओलावा कायम राहिला. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले, परंतु म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी व रात्री तालुक्यात सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले भरून वाहू लागले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेकडो एकरवर दुबार पेरणीचे संकट टळले आहे.