लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांच्या ३५ पाल्यांच्या शिक्षणाची सुविधा आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखानामार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी कारखाना परिक्षेत्रातील ऊस कापणीसाठी चाळीसगाव, धुळे, कन्नड, साक्री व मालेगाव भागातून ऊसतोड कामगार दाखल झाले आहे. काही कौटुंबिक अडचणींमुळे या कामगारांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांनाही सोबत आणले आहे. या मजुरांनी समशेरपूर साखर कारखान्याजवळ वसाहत निर्माण केली आहे. तेथे पौढ व्यक्तींसह काही सहा ते १४ वर्ष वयोगटातील मुलेही दिसून येत होते. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य अथवा शालेय शिक्षण घेणारे असू शकतात, अशी शंका काही घटकांमधून उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम व गट शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने सर्व्हेक्षण केले. त्यात तेथे २८ मुले आढळून आले होते. ही मुले शालेय शिक्षण घेणारे असल्याचे देखील सिद्ध झाले.शिक्षण विभागामार्फत या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना समशेरपूर येथील शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. परंतु तांड्यापासून समशेरपूरची लांब असल्यामुळे हे मुले शाळेत येणार नाही. ही बाब देखील शिक्षण विभागाने विचारात घेतली. उपाययोजना करुनही मुलांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचेही शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखाना व्यवस्थापनाकडे या मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्याची दखल घेत कारखान्यामार्फत साखर शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत.या शाळेत सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या २८ विद्यार्थ्यांसह नंतर आलेल्या चार विद्यार्थ्यांची देखील शिक्षणासाठी सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या शाखर शाळेत एकुण ३२ विद्यार्थी दाखल झाले आहे, त्यात १७ मुली व १५ मुलांचा समावेश आहे. कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेल्या साखर शाळेमुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळल्याचे त्यांच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय कारखाना व्यवस्थापनाच्या भूमिकेचेही पालकांनी कौतुक केले.साखर शाळेला शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी भेट देत गट शिक्षणाधिकारी डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेतला. यावेळी केंद्रप्रमुख एस.बी. वानखेडे, पी.बी. पाटील, डी.ए. पाटील, वैशाली बोरसे, नंदलाल गिरासे, कांतिलाल मराठे, शेतकी अधिकारी अरविंद पाटील साखर शाळेचे शिक्षक विशाल पाटील, कृष्णराव आदी उपस्थित होते.
स्थलांतरित मुलांचे टळले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:30 IST