लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा/सारंगखेडा : तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे ३० दरवाजे सकाळी ११ वाजता उघडले असून १०१४७४ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढील ४८ तासात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी तीन वाजता प्रकाशा बॅरेजचे चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून ६९ हजार ४४२ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून ६२ हजार ४०८ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हतनूर आणि सुलवाडे बॅरेज धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.पुढील ७२ तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. ऋषीपंचमी निमित्त महिलांनी तापी नदीकाठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.दरम्यान, तापीला मिळणाऱ्या अनेक नद्यांच्या परिसरात देखील शनिवारी दिवसभर पाऊस झाला. त्यामुळे या नद्यांना देखील पाणी आले आहे. ते पाणी देखील तापीला मिळत असल्याने पातळी वाढत आहे.
प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:17 IST