पावसाचे दिवस सुरु झालेले असले तरी महिना उलटूनदेखील शहर व परिसरात पावसाचा थेंब नसल्यामुळे वातावरण तापलेले आहे. १५ ते २० दिवस होऊनही पाऊस न झाल्याने वातावरणात गारवा निर्माण न झाल्याने तापमान वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक घरात, दुकानात पंखा व कुलर सुरूच आहे. अगोदरच गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागरिक उन्हाच्या तापमानाने लाहीलाही झाले असून, पावसाची वाट पाहात बसलेले आहे. परंतु वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी सकाळी धामण जातीचा सर्पाने ३३ केव्ही ब्रेकरच्या पॅनलमध्ये प्रवेश केल्याने वायरिंगचा स्फोट होऊन संपूर्ण शहादा शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत केलेला आहे.
शहरातील कुठल्याही वसाहतीत विद्युत पुरवठा खंडित झालाच तर महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुजित पाटील व त्यांचे कर्मचारी हे तातडीने त्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. यासाठी गेल्या दोन वर्ष अगोदर शहादा शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून महावितरण वीज कंपनीचा स्वतंत्र ग्रुप तयार करून त्या ग्रुपवरती ज्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होतो त्या भागातील वसाहतीतील नाव आल्यामुळे त्या भागात त्वरित जाऊन अधिकारी, कर्मचारी हे विद्युत पुरवठा सुरळीत करत आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या तत्पर सेवेमुळे नागरिकांच्या तक्रारी आता सहज सुटत असल्याने नागरिकांनी वीज कंपनी बाबत समाधान व्यक्त केले आहे.