गुरूवारी दुपारी एक वाजता अचानक वीज वितरण कंपनीच्या चार पथकांनी घरगुती मीटर तपासणीसाठी गावात श्रीरामनगर भागात धाड टाकली. या पथकांमध्ये धुळे, जळगाव, मालेगाव व नंदुरबार येथील कर्मचारी असल्याचे सांगितले. चारही पथकात २० अधिकारी व कर्मचारी होते. त्यांच्या पथकात कोण कोण आहेत, नावांची विचारणा केली असता नावे सांगण्यास असमर्थता दर्शवली. कोरोना कालावधी सुरू असून पथकातील अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. घरात महिला असताना विचारणा न करता घरात प्रवेश केला. परवानगी आहे का, ओळखपत्र दाखवा, ग्रामपंचायतची परवानगी घेतली का, पथकात स्थानिक अधिकारी का नाही, गावाबाहेर आकडे टाकून अवैध वीज वापरतात, तेथे कारवाई का करत नाहीत, अशी विचारणा केली. उपसरपंच चिंतामण लांडगे यांनी आधीच लोक कोरोना काळामुळे हैराण आहेत, निसर्गाचा कोप यामुळे कर्जबाजारीत बुडाला आहे, शेतात वेळेवर वीज नाही याबाबत विचारणा करून नियमानुसार कारवाई करा, असेही सांगितले.
दरम्यान, महिलावर्ग जास्त संतप्त झाल्या होत्या. ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली व त्यास समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने वातावरण तापले. वातावरण तापते आहे हे पाहून पथकवाल्यांनी गावातून काढता पाय घेतला.