येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात रमजान ईद व अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीला नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागूल, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, जि.प.चे माजी सभापती अभिजीत पाटील, नुह नुरानी, अरविंद कुवर, सुपडू खेडकर, डॉ. कांतीलाल टाटीया, निहाल अन्सारी, प्रा. लियाकत अली सैयद, नगरसेवक वाहीद पिंजारी, संदीप पाटील, वसीम तेली, सुनील गायकवाड आदींची उपस्थिती होती. बैठकीत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, सण-उत्सव साजरे करताना शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका व पोलीस, महसूल प्रशासन नागरिकांसाठी उपाययोजना करीत आहे. त्यांच्या कार्याला नागरिकांनी सहकार्य करुन कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. डॉ. टाटीया म्हणाले, जीवघेणी महामारी गेल्यानंतर सर्व उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे करु या. सद्यस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असून एकमेकांना समजून घ्यावे. अशोक बागूल म्हणाले, सण-उत्सव साजरा करण्याची ही वेळ नाही. देशात कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. प्रशासनाचे आदेश पाळून सण-उत्सव घरात शांततेत साजरे करा. पोलीस उपअधीक्षक घुमरे म्हणाले, कोणत्याही शब्दाचा गैर अर्थ काढू नका, यातून वाईट परिणाम होऊ शकतात. महामारीने अनेकांचे प्राण घेतले आहेत. संयम ठेवण्याची गरज असून वेळ आणि संयम ठेवल्यास आपण महामारीचा एकजुटीने सामना करुन संक्रमण थांबवू शकतो. पोलीस प्रशासन नेहमी सहकार्याच्या भावनेत असते. शासनाच्या आदेशाचे पालन करुन येणारे सण-उत्सव नागरिकांनी घरातच साजरे करावे, असे आवाहन केले. अलताफ मेमन म्हणाले , रमजान आम्ही सर्व मुस्लिम बांधव घरातच राहून साजरे करु व शासनाच्या नियमांचे आधीन राहून रमजान ईद साजरी करण्यात येईल, असे जाहीर केले. प्रा.सैयद, नगरसेवक वाहीद पिंजारी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी तर आभार पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी मानले.
शहाद्यात शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST