ब्राह्मणपुरी येथील सतीश पाटील यांच्या पानटपरीला शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती संबंधित टपरी मालकाला मिळताच त्यांनी येथे धाव घेतली. परंतु पोहोचण्यात उशीर झाल्याने संपूर्ण टपरी जळून खाक झाली होती. यात टपरीत असलेल्या पानमसाल्यासह वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीत किरकोळ रोकड व सामानासह पानटपरी असे सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानाचे मालक सतीश पाटील यांनी व्यक्त केला.
सतीश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून जवळ असलेल्या सूतगिरणीत कामाला होते. परंतु गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांनी आत्मनिर्भर बनून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला व ब्राह्मणपुरी गावात पानटपरी टाकून व्यवसाय सुरू केला. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे सतीश पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने हिरमोड झाला आहे.