लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील जीवघेणे खड्डे अपघातस निमंत्रण देऊ पाहात आहेत. या महामार्गावरील तळोदा ते गव्हाळीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे व पुलांचे संरक्षण कठडे आदी खराब झाालेले आहेत. वाहनचालक व प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.या महामार्गावरील अनेक पुलावर भगदाड पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणच्या पुलांवरील स्लॅबच्या लोखंडी सळ्यावर आलेल्या आहेत. संरक्षण कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अवघड वाहने पलटण्याचा धोका वाढला आहे. तसेच दुचाकीस्वारांना या मार्गावर वाहनचालविताना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो. या परिस्थितीमुळे तळोदा ते गव्हाळी दरम्यानचा मार्ग जीवघेणा ठरू पाहात आहे.नेत्रांग व शेवाळी हा राष्ट्रीय महामार्ग असून, या मार्गावर अनेक अवजड वाहतुने अपघात ग्रस्त होत आहेत. तळोदा ते गव्हाळीपर्यतच्या महामार्गाची मे महिन्यात दुरूस्ती करण्यात आली. मात्र अवघ्या दोन महिन्यातच हा महामार्ग खड्डेमय झाला. महामार्गावर एक-दोन फुटाचे खोल खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावर दररोज लहान मोठ्या मोटरसायकलींचे अपघात होत आहेत. हा महामार्गावर गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश अशा तीन राज्यांना जोडला गेला आहे.गुजरात राज्यातून अवजड सामग्री महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शहरांमध्ये जात असल्याने अतिशय जास्त वजनाची वाहने व कंटेनर रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेची वाहने या मार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. तसेच अनेक नदींवरील पुलांची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. बारडोली, व्यारा, सोनगड, नवापूरवरून मध्यप्रदेशात जाणारी सर्व वाहने या मार्गाने जात असल्याने वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.हा राज्य मार्ग असल्याने या मार्गाची वाहतूक क्षमता नऊ ते १५ टन वजन वाहून नेण्याची आहे. मात्र या मार्गावरून २५ टनाची अवजड वाहने जात असल्याने सातत्याने रस्ते खराब होत असून, ठोस उपाययोजना करून या मार्गाचे उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळोदा ते गव्हाळीपर्यंतच्या रस्त्यावर केवळ खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:27 IST