नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अनुदानित बियाण्यासाठी केवळ चार शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करू शकले आहेत. २४ मे रोजी या योजनेत नोंदी करण्याची अंतिम मुदत होती. खरीप हंगामात अन्नधान्य, गळीत धान्य व व्यापारी पिकांचे प्रमाणित बियाणे व बियाणे मिनीकिट यासाठी हे अर्ज मागवण्यात आले होते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार बियाणे वितरणासाठी २ हजार ४०७, प्रात्यक्षिकांसाठी १ हजार १५५४, आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी २७६ तर बियाणे मिनीकिटसाठी ३२१ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या अर्जांवर येत्या दोन दिवसात शासन कामकाज करुन ऑनलाइन पद्धतीने सोडत काढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोबाइलवर एसएमएस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य, धान्य व सोयाबीन बियाण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या योजनेत समावेश व्हावा यासाठी जिल्ह्यातील इतर शेतकरी उत्सुक होते. २० मे पर्यंत मुदत असलेल्या या योजनेला २४ मे पर्यंतची मुदत दिली गेली होती. परंतु यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या कमीच आहे. गेल्या दोन वर्षात आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे योजनेचा लाभ आवश्यक वाटत होता. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.