चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता आपण सर्वांनी जागरूक राहून पाण्याविषयी आपल्या घरी, गावात, परिसरात, पाण्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असले पाहिजे असा आग्रह धरला. जलसाक्षरता केंद्र संचालक आनंद पुसावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जलसाक्षरतेचे महत्त्व सांगून समाजाच्या विविध स्तरातील लोकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचविण्याची गरज प्रतिपादित केली, प्रत्येक गावाने आपल्या गावाचा पाण्याचा ताळेबंद ठेवला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
कृषी अभियांत्रिकी राहुरी विभागप्रमुख विभाग, डॉ. एस. डी. गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, पाण्याचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीने करता येईल याची जाणीव वापरकर्त्यामध्ये रुजविणे गरजेचे आहे. विभागीय विस्तार धुळे केंद्रप्रमुख डॉ. मुरलीधर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नाची गरज लक्षात घेता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असल्याचे म्हणाले.
चर्चासत्र समारोप प्रसंगी १६ ते २३ मार्च दरम्यान जलसाक्षरता तालुका धडगाव समितीतर्फे जलसाक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या जलसाक्षरता सप्ताहातील विविध वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती देताना प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी सातपुड्यातील जलदूतांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात जलसाक्षरता ही एक मोहीम म्हणून राबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये शेतकरी, पाटबंधारे विभागातील जलकर्मी, तसेच मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.