नंदुरबार : जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पार पडला असला तरी ग्रामीणसह दुर्गम भागात लसीकरणाचा वेग वाढत नसल्याची स्थिती आहे. भीती आणि गैरसमज हे कारणे असल्यामुळे जनजागृतीवर भर देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार इतके लसीकरण झाले आहे. लक्ष्यांकापेक्षा ते केवळ ३० टक्के इतके आहे. लसीकरणाला वेग मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ६० ठिकाणी सोय करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात गैरसमज आणि भीतीमुळे लसीकरणास प्रतिसाद कमी राहत आहे. जनतेमधील भीती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथनाट्याद्वारे प्रयत्न चालविले आहेत. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी स्वत: आदिवासी, अहिराणी व मराठी भाषेत जनजागृतीपर आवाहन करणारे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित केले आहेत. दरम्यान, १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण केले जाणार असल्यानेही वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.