नंदुरबार : कोरोनाच्या भीतीमुळे हाॅटेलमधील पार्सल सेवेला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शिवाय गेल्या वर्षाप्रमाणे यंदा स्वयंसेवी संस्थांनी मोफत भोजनाची सोयदेखील केलेली नाही.
संचारबंदी काळात जिल्ह्यातील भोजनालये व हाॅटेल चालकांना पार्सल सेवेची परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने नागरिक बाहेरील जेवण घेण्यासही भीत असल्यामुळे पार्सल सेवेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केलेले अन्न वाया जाणार, या शक्यतेने अनेक हाॅटेल चालकांनी हाॅटेल बंद ठेवणेच पसंत केल्याचेही चित्र आहे. काही हाॅटेलचालक आगाऊ नोंदणी असेल तरच पार्सल सेवा देत आहेत.
दुसरीकडे गेल्यावर्षी लाॅकडाऊन काळात सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर अन्नछत्र चालवले होते. त्याला बेघर, गरीब, मजूर यांचा चांगला प्रतिसाद होता. परंतु, यंदा अशा संस्थांनी मोफत अन्नछत्र चालविणेही बंद केलेे आहे. त्यामुळे बेघर असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे आठवड्यातील पाच दिवस कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घरपोच डब्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तिला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे.