राधेश्याम कुलथे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गोरगरीबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांना पुन्हा चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्याचे स्वप्न सरकारने दाखविले पण सिलिंडर भरण्यासाठी पैसेच नसल्याने गरीबांना वर्षाला कसेबसे पाच ते सहा सिलिंडर वापरावे लागतात. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. गॅसही नाही व रॉकेलही नाही अशी अवस्था झाली असून रेशनकार्डावर पुन्हा रॉकेल देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.रेशन दुकान हे सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर दिले जाणार होते. आॅनलाईन गॅस भरण्यासाठी पैसेही बँकेत जमा करण्यात आले. परंतु गॅस भरण्यासाठी बँकेत तीन महिन्याकरिता पैसे जमा करण्यात आले. आता ते बंद झाल्याने लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसणाऱ्या कुटुंबीयांना गॅस भरणे परवडत नसल्याने गॅससाठी पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न पडला आहे. उज्ज्वलाचा गॅसही नाही आणि हक्काचे मिळणारे अनुदानातील रॉकेलही नाही. शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि अतिदुर्गम भागातील झोपडपट्टी भागात सकाळी आंघोळीचे पाणी तापविणे, स्वयंपाक करणे यासाठी सर्रास पुन्हा चुलीचाच वापर केला जातो किंवा स्टोव्हचा वापर केला जातो. पण रॉकेल मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.रॉकेल वाटप बंदरेशनकार्डवरील रॉकेल नियंत्रित दराने मिळत होते. प्रत्येक कुटुंबाला पाच ते २४ लीटरप्रमाणे संख्येनुसार रॉकेल मिळत होते. पण एक गॅस सिलिंडर असणाऱ्यांनाही चार लीटर प्रतिमहिना प्रतिकार्ड रॉकेल दिले जात होते. पण हे रॉकेल वाटप बंदच असल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.शहादा तालुक्यात उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या धोरणामुळे सुरू झाली. शहादा तालुक्यातील सोना गॅस एजन्सी, रेखा गॅस एजन्सी, वेदांत गॅस एजन्सी, आदिराजा गॅस एजन्सी मिळून तालुक्यात सुमारे १५ हजार ८१६ उज्ज्वला योजनेतील गॅस कनेक्शन आहेत. या ग्राहकांचा गॅस वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हे ग्राहक गरीब कुटुंबातील असल्याने उज्ज्वला गॅस ते पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे वर्षाला चार ते पाच सिलिंडरच ते घेतात. त्यामुळे ते चुलीचा वापर पुन्हा करतात.
सिलिंडर भरण्यासाठी पैसेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:48 IST