बिबट्यांनी तळोदा तालुक्यातील शेतशिवारात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांपाठोपाठ त्यांनी माणसांवरही हल्ले सुरू केले असल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर अनेकवेळा हल्ले केल्याने मोठी दहशत माजली आहे.
सहसा दाट झाडीझुडपात लपूनछपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत ‘छलिया शिकारी’ समजला जातो. मिळेल त्या परिस्थितीत मिळेल ती शिकार करण्याचे कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्थापित होत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. मानवी वस्त्यांच्या सीमेवर येऊन मिळेल त्या भक्ष्याची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
तालुक्यात सायंकाळी अंधार गडद होऊ लागताच बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होतो. हल्ल्याच्या भीतीने रहिवाशांना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वस्त्यांवरील पाळीव कुत्री, बकऱ्या, कोंबड्या, गायी, म्हशींची सहज शिकार मिळत असल्याने बिबटे आता मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या नेमकी किती असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात असून, मनुष्य जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
वसाहतीतील लोकांनी घ्यायची काळजी
शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे शक्यतो बंदिस्त गोठ्यात बांधावीत.
शेतात एकट्याने जाण्याची वेळ येईल त्यावेळी ध्वनिनाद निर्माण करीत जावे.
बिबट्या शक्यतो उभ्या व्यक्तीवर हल्ला करीत नाही. तो खाली बसलेली, वाकलेली व्यक्ती म्हणजेच त्याच्या नजरेच्या टप्प्यातील आकृती यास तो सावज समजून हल्ला करू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत वाकणे, खाली बसणे टाळा.
वनविभागाकडून अपेक्षा
ठिकठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.
बिबट्या नरभक्षकाच्या व्याख्येत बसत असेल तर त्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
उपद्रव असलेल्या गावांमध्ये नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांसंदर्भात जागरूक करणे. तसेच परिसरात कायमस्वरूपी वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हातोडा शिवारात बोकड फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतमजूर शेतशिवारात यायला घाबरत आहेत. दरम्यान, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कापूस पेरणी करायचा बाकी आहे आधीच पाऊस कमी पडल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करावी लागत आहे. बिबट्यांचा दहशतीमुळे शेत शिवारात काम करण्यासाठी मजूर येणार नाहीत तर उपाशी मरायची वेळ येईल. - अभिजित कलाल, शेतकरी, तळोदा.