राज्यातील कोकणबरोबरच सांगली, सातारा व कोल्हापूर येथे झालेल्या अति पर्जन्यवृष्टीत लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे संसारही उघड्यावर आले आहे. त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तळोदा शहरात मंगळवारी मदत फेरी काढण्यात आली. या फेरीस ख्वाजा नाईक चौकापासून सुरुवात करण्यात आली. मेन रोड, तहसील रोड, या भागात मदत फेरी काढण्यात आली होती. व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत दिली. माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत ही फेरी काढण्यात आली होती. सदर मदतफेरीत राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष निखिल तुरखीया, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे, सहकार सेलचे जिल्ह्याध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी, योगेश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, गणेश पाडवी, कमलेश पाडवी, आदिल शेख, धर्मराज पवार, मुकेश पाडवी, जयेश जोहरी, खुशाल कोटे, अरविंद वळवी, संदीप पाडवी, सुनील पाडवी, कुणाल शिरसाठ, रवींद्र पाडवी, जावेद पिंजारी, इम्रान सिकलीकर, नदीम बागवान, आकाश पाडवी, पप्पू पिंजारी, प्रकाश पाडवी, सागर खैरनार, संजय वानखेडे, विकास खाटीक आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या नैसर्गिक आपत्तीत जीवित हानीही झालेली आहे. मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून या मदतफेरीची सांगता करण्यात आली. दरम्यान पूरग्रस्तांसाठी मदतफेरीत संकलित झालेल्या निधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्तेही स्वतःची रक्कम टाकणार असून, असा हा संपूर्ण निधी दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.