नंदुरबार : जिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेल्या २१ रुग्णांपैकी १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुळचे बामखेडा, ता.शहादा येथील रहिवासी व्यक्ती नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्याने प्राथमिक स्तरावर तरी कोरोनावर मात केली असून यापुढील काळात जनतेने काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या सर्वच कोरोनारुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहेत. शेवटच्या दोन अर्थात आष्टे व नटावद येथील रुग्णांना सोमवारी सायंकाळी उशीरा डिस्चार्ज देण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १७ एप्रिल रोजी नंदुरबार येथे आढळून आला होता. तेंव्हापासून ८ मे पर्यंत एकुण २१ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी शहादा येथील एका युवकाचा तर नंदुरबार येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. १९ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयशोलेशन कक्षात उपचार करण्यात आले. टप्प्याटप्याने सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना त्या प्रमाणे जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८ मे नंतर जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी बामखेडा, ता.शहादा येथील मुळ रहिवासी असलेला व्यक्ती नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना तेथे पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्यावर नाशिक येथेच उपचार सुरू आहेत.
बामखेडा ११ अहवाल निगेटिव्ह
बामखेडा : येथील कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ११ स्वॅबचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.बामखेडा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार प्रशासनाने लागलीच गावात धाव घेऊन पुढील उपाययोजना केल्या. आणि रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ति, तीन खाजगी डॉक्टर व खाजगी ड्रायव्हर यांचे असे एकूण १६ स्वॅब नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे नमुने हे निगेटीव्ह आल्याने गावात काही अंशी चिंतेचे वातावरण कमी झाले आहे.असे असले तरी ग्रामस्थांनी प्रशासन व ग्रामपंचायतील पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन सरपंच लिना चौधरी व पोलिस पाटील डॉ योगेश चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना कायम आहेत. ठिकठिकाणी बॅरीकेटींग कायम असून वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जात आहे.