नंदुरबार जिल्ह्यातील सहापैकी चार पंचायत समित्यांच्या कारभाराची मदार प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांवर असल्याने ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अडचणी येत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवार, १५ जून रोजी प्रसिद्ध केले होते. याच वृत्तात जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर पंचायत समितीच्या बदली झालेल्या, निवृत्त व मृत झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अद्याप असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तत्काळ दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारीच सकाळी आठ वाजण्यापूर्वीच जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची नावे पंचायत समितीनिहाय अद्ययावत केली.
दरम्यान, वेबसाईटवर दिलेल्या कार्यालयाच्या फोन नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता धडगाव व्यतिरिक्त इतर पाचही पंचायत समितीचे फोन नंबर बंद असल्याचे समजते. या क्रमांकावर संपर्क होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे वेबसाईटवर सध्या कार्यरत असणारे फोन नंबर अथवा गटविकास अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे.