नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावस्तरावर पथके स्थापन करण्यात आली असून एका दिवसात ५० घरांचा सर्व्हे या पथकाला करावा लागणार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी कोरोनाकाळात ‘माझे कुटुंब, माझी जबादारी’ या अंतर्गत दोन टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात अनेक व्याधींचे रुग्ण निष्पन्न झाले होते शिवाय कोरोनाचे लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची पडताळणी होऊन त्यांना लागलीच उपचार मिळण्यास देखील मदत झाली होती. आता तशाच प्रकारचा सर्व्हे येत्या तीन दिवसांत करण्याचे निर्देश देण्यात आले असून काही गावांमध्ये त्याची सुरुवातदेखील झाली आहे.
पथकांची स्थापना
नंदुरबार तालुक्यात पथकांची स्थापना करून कामाला सुरूवात झाली आहे. पथकात गावातील शाळेतील शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांचा समावेश आहे.
कशाची होणार तपासणी
सर्व्हेक्षण अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची ताप, खोकला, दम लागणे, पल्स रेट, शरीरारील ऑक्सिजनची लेव्हल, एएलआय आणि सारी या आजारांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांचीही माहिती याद्वारे घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक रुग्णांना कोरोनाची लक्षणे असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करून उपचार घेण्यास उशीर करत असतात. आजार बळावल्यावर दवाखान्यात दाखल होतात. अशावेळी रुग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त संशयित रुग्णांपर्यंत पोहोचणे व त्यांना संदर्भीय उपचार देणे हा उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.