पोलीस सूत्रानुसार, नवापूर तालुक्यातील बोरविहीर येथील मुलीशी प्रेमसंबंधातून पळून जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने बोरविहीर येथील मुलीचे वडील व दोन्ही भाऊ यांनी शुक्रवारी रात्री मयत अजय राजाराम गावित यांच्या घरात प्रवेश करून संदीप सखाराम गावित याने हातात चाकू घेऊन अजय गावित याच्या छातीत खुपसून निर्घृण वार करून युवकाचा खून केला. त्या चाकूच्या साहाय्याने सखाराम नूरजी गावित याने मयत युवकाची आई सावित्रीबाई राजाराम गावित यांच्या पोटात चाकू खुपसून दिला. यात सावित्रीबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. तर समूवेल सखाराम गावित याने मयत युवकाचे वडील राजाराम नूरजी गावित यांना लाकडी काठीने हातापायावर वार केल्याने गंभीर जखमी केले. काही ग्रामस्थांनी अजयसह त्याच्या आई-वडिलांना रक्तबंबाळ अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले. तर सावित्रीबाई गावित गंभीर जखमी असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वडील राजाराम गावित यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवापूर पोलिसांनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पंचनामा व चौकशीनंतर प्रकाश राजाराम गावित यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी संदीप सखाराम गावित (२५), समूवेल सखाराम गावित (२७), सखाराम नरसी गावित (४८) तिघे रा. बोरविहीर येथील पिता-पुत्र आरोपींना रात्रीच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. बोरविहीर गावात शांतात असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजय गावित याच्यावर शनिवारी बोरविहीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंदुरबार फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी रक्ताचे नमुने, ठसे घेतले व घटनेची माहिती जाणून घेतली.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी
मयत अजय गावित यांच्या छातीत चाकू पाठीपर्यंत खुपसून निर्घृण हत्या केल्याने रक्तबंबाळ अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी बोरविहीर गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात व नवापूर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी केली व नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयात व पोलीस ठाण्यात ग्रामस्थांची गर्दी दिसून आली.
अनेक वेळा वाद मिटवला
नवापूर पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी दोन्ही गटांतील सदस्यांची बैठक घेऊन वाद मिटविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा किरकोळ वाद सुरूच होते. ग्रामस्थांनीही दोघांची समजूत घातली होती. परंतु काही उपयोग न झाल्याने शेवटी युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली.