काेरीट ता. नंदुरबार येथील उषाबाई हिरामण कोळी (४६) या नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या, परंतु सायंकाळी त्या परत आल्या नव्हत्या. यामुळे त्यांचे पती हिरालाल झुलाल कोळी हे त्यांना शोधण्यासाठी शेताकडे गेले, परंतु त्या शेतात मिळून आल्या नाहीत. त्यानंतर हिरालाल व कोरीट गावातील इतर ग्रामस्थांनी उषाबाई यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास शांतीलाल जतन कोळी यांच्या उसाच्या शेतात उषाबाई यांचा मृतदेह आढळला होता. यावेळी त्यांच्या गळा, हात व मानेवर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने उसाच्या शेताच्या मध्यभागी फेकून दिल्याचे पोलिसांना दिसून आले होते. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन शेतात पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली. याबाबत मयताचे पती हिरालाल कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक, विजय पवार यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्यानंतर एलसीबीचे चार पथक सक्रिय झाले होते. घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होऊ शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
घटनेच्या दिवशी ज्या उसाच्या शेतात मयताचा मृतदेह मिळून आला ते शेत, जेथे तो मृतदेह पडलेला होता ती चारी व मयताला शेवटच्या वेळी पाहणारा हा एकच इसम आहे, तसेच तो त्या दिवशी टोकर (बांबू) तोडत होता. या मिळालेल्या माहितीवरून एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथकास संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने संशयित रामचंद्र नागू कोळी, रा. कोरीट, ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेत चाैकशी केली, असता संशयिताने मागील भांडणाचा रा. मनात धरून ४ जुलै रोजीच्या भांडणाचा रा. मनात धरून उषाबाई यांचा धारदार हत्याराने खून केल्याचे कबूल केले. कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसताना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. संशयित रामचंद्र कोळी यास गुन्ह्याच्या पुढील कारवाईसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार, विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दीपक गोरे, रवींद्र पाडवी, महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, जितेंद्र तांबोळी, सजन वाघ, मुकेश तावडे, विनोद जाधव, पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश वसावे, बापू बागुल, दादाभाई मासुळ, सुनील पाडवी, विशाल नागरे, राकेश मोरे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, गोपाल चौधरी, मनोज नाईक, जितेंद्र ठाकूर, जितेंद्र तोरवणे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, किरण मोरे, अभय राजपूत, आनंदा मराठे, शोएब शेख, राजेंद्र काटके, यशोदीप ओगले, तुषार पाटील, रमेश पाडवी, रमेश साळुंके, सतीश घुले यांनी केली.