शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सपाटा सुरू आहे. कधी दुष्काळ तर कोरोना तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी उन्हाळी हंगामात कोरोनामुळे पिके शेतातच पडून खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर गेल्या हंगामात पिके काढणीस आली आसतानाच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर केळी, पपईची रोप लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. केळी, पपई पिकांची कशीबशी लागवड केली. मात्र ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत कशीबशी पिके जगविण्याचा आटापिटा सध्या सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. मोठ्या प्रयत्नाने वातावरणावर मात करीत शेतकरी पिकांचे स्वास्थ्य टिकविण्याचा प्रयत्न करीत असले तरी महावितरणच्या लहरी वीजपुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. वीजपुरवठा दिवसाचा असला तरी वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांना पुरेसे पाणी देणे होत नाही. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना बसत आहे. शहादा तालुक्यातील भागापूर परिसराला वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आधीच सलग दोन हंगाम अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा जास्त अंत न पाहता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
फॉल्ट काही सापडेना
भागापूर शिवारात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून संबंधित लाईनमन यांना वीजपुरवठा वारंवार खंडित का होत आहे याचा फॉल्ट काही सापडेना अशी गत झाली आहे. यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या केळी, पपईच्या रोपांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
शेतात केळी, पपई पिकाची लागवड केली आहे. सध्या गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत असून पाण्याअभावी रोप करपू लागले आहे. वीज वितरण कंपनीने एकदाचा फॉल्ट शोधून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा आहे.
-जगदीश पाटील, शेतकरी, भागापूर, ता.शहादा