लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील ५८ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रूपये प्रमाणे दोन महिन्याचा भत्ता त्यांच्या आईच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत कलम ६ (३) (१) नुसार नजीकच्या शाळांच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत अशा वस्त्यांमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. जेथे एस.टी.ची सुविधा नाही तेथे केंद्र शासनाकडून वाहतुकीकरीता प्रति विद्यार्थी दर महिन्याला ३०० रूपये असे १० महिन्यासाठी तीन हजार रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात येते. या वर्षी मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना १० महिन्याऐवजी केवळ दोन महिन्याचा वाहतूक भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील ५८ विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत.
कोरोनाचा बसतोय फटका
यावर्षी कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. जागतिक महामारीचा शिक्षण क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला आहे. सुरूवातीला ऑनलाईन शाळा सुरू होत्या. त्यानंतर राज्यातील सर्व शाळा अर्थात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे पूर्ण शैक्षणिक वर्षात हे वर्ग दोन महिने वर्ग सुरू राहिले. त्यामुळे केंद्र शासनाच्या सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत १० महिन्यांसाठी मिळणारा भत्ता यावर्षी फक्त दोन महिन्याकरिता मिळणार आहे.
जिल्ह्यातील ५८ विद्यार्थी त्यासाठी पात्र असून, त्यांना दरमहा ३०० रुपये असे दोन महिन्याकरिता ६०० रुपये प्रमाणे ३४ हजार ८०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
हा भत्ता पालकांच्या विशेषत: आईच्या बँक खात्यावर जमा करण्याचा शासनाचा निर्णय आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या ५८ विद्यार्थ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे भत्ता देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
या योजनेसाठी राज्यातील २९ जिल्ह्यातील ८४७० विद्यार्थी पात्र असून, त्यांना दरमहा ६०० रूपये प्रमाणे ५० लाख ८२ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात उच्च प्राथमिक शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थ्यांच्या गाव वस्त्यांपर्यंत एस.टी. वाहतूक व्यवस्था नसल्याने केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत हे विद्यार्थी वाहतूक अनुदानासाठी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांना १० महिन्याचा भत्ता देण्यात येईल. मात्र यावर्षी कोरोनामुळे २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना यंदा केवळ दोन महिन्याचाच भत्ता मिळणार आहे. त्याची कार्यवाही झाली आहे.
-वनमाला पवार, प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी, नंदुरबार