नवापूर शहरात आतापर्यंत २२ पोल्ट्रींमध्ये पाच लाख ७८ हजार पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत. मात्र पोल्ट्रीतील निर्जंतुकीकरण करण्याचे काम राहिल्याने प्रशासनाने निर्जंतुकीकरण संदर्भात व्यावसायिकांना सूचना केल्या. यासंदर्भात पोल्ट्री व्यावसायिकांनी २० फेब्रुवारीपर्यंत पोल्ट्रीतील निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यासाठी मुदत मागितली आहे.
शहरातील बर्ड फ्लू बाधित पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईबाबत समस्या मांडली. शासनाने दिलेला निधी हा कमी असल्याने मोठ्या प्रमाणात भरपाई मिळावी, अशी मागणी प्रांतधिकारी व तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. केंद्र सरकारकडून पशुखाद्यबाबत १२ रुपये किलोप्रमाणे मिळणारी भरपाई अत्यंत कमी आहे. महाराष्ट्र सरकाचा पशुखाद्य १९ रुपये किलोप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आहे. त्यानुसार आम्हाला जास्तीची भरपाई मिळावी, अशी मागणी या वेळी करण्यात आलेली आहे.
नवापूर शहरातील उर्वरित चार बर्ड फ्लूची लागण नसलेले व दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यातील व्यावसायिकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात रात्री निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चारही पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल भोपाळ येथे पाठवण्यात आले आहेत. त्याचाही रिपोर्ट अद्याप आलेला नसून रिपोर्ट आल्यानंतर पुढील किलिंग ऑपरेशनसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
या बैठकीत नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ बलेसरिया, गुलाम व्होरा, सलाम बलेसरिया, रिची शाह, कमलेश शाह, मोहम्मद मुल्ला, अशरफ टिमोल, असीम बलेसरिया, सुरेश प्रजापत, सालेम व्होरा आदी पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.
पॅरानीयार पोल्ट्री २८ हजार, पक्षी पॅराडाईज चार हजार ६०० पक्षी, रिची पोल्ट्री सहा हजार ५०० पक्षी, अशरफ पोल्ट्री, १२ हजार पक्षी या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कुकुट पक्षी व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात नवापूर तहसील कार्यालयात पोल्ट्री व्यावसायिकाची बैठक घेण्यात आली. यात एक किलोमीटरऐवजी अडीच किलोमीटर अंतर निश्चित केल्याने चार पोल्ट्रीमधील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. दोनवेळा कुकुट पक्षीचे अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिसरा अहवाल घेण्यात आला आहे. अहवाल निगेटीव्ह असताना कुकुट पक्षी नष्ट करण्याचा अट्टहास का करण्यात येत आहे? असा सवाल त्यांनी तहसील कार्यालयात उपस्थित केला. त्यामुळे या चार पोल्ट्रीमधील व्यावसायिक औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यासाठी गेले आहे.
केंद्रीय पथकाची पाहणी
नवापुरात २२ पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर दोन सदस्य केंद्रीय पथकाने सर्व पोल्ट्रीमध्ये जाऊन पाहणी केली व व्यावसायिकांना उपाययोजना संदर्भात सूचना केल्या. तसेच बर्ड फ्लू होऊ नये यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले. तहसील कार्यालयात पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक घेतली. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.