तालुक्यातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक जरी होत असली तरी नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने मुहूर्ताच्या काळात मंगल कार्यालये नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती कायम असल्याने मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापक, मंडप सजावटवाले आणि कामगारांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत.
शासनाने नियमावलीमध्ये शिथिलता आणत मंगल कार्यालयाना ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात साखरपुडा अथवा विवाह समारंभाला परवानगी दिली आहे. परंतु दिवाळीच्या नंतर झालेल्या कोरोना रुग्णांच्या वृद्धीने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. दिवाळी अगोदर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेकांनी आपला साखरपुडा अथवा विवाह समारंभ उरकून घेण्याची तयारी दाखवली होती. यासाठी अनेक मंगल कार्यालयात आगावू नोंदीसुद्धा झाल्या. परंतु दिवाळीनंतर अनेकांनी आपली नोंदणी रद्द करत आपले समारंभाचे तारीख पुढे ढकलले आहेत.
जोडधंद्यावरही परिणाम
लग्न सराईत चालणाऱ्या जोडधंद्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, जेवण बनविणारे कारागीर, मदतनीस अशा हजारो जणांना याचा फटका सहन करावा लागत आहे. आधीच लाॅकडाऊनच्या काळात काम नसल्याने आर्थिक फटका सहन करणारे हे व्यावसायिक येत्या काळात व्यवसाय नसल्याने हवालदिल झाले आहेत.
फेब्रुवारी व मार्चची नोंदणी रद्द
कोरोणाच्या धास्तीने अनेकांनी केवळ घरच्या घरी आपले समारंभ आटोपण्याचे ठरविले असल्यानेदेखील नोंदणी रद्द झाल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. त्याच बरोबर अनेकांनी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याची आगावू नोंदणी केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती या महिन्यांत वर्तवली असल्याने या महिन्यांतील नोंदणीसुद्धा रद्द होत आहेत. शासनाने परवानगी दिली असली तरी नोंदणी होत नसल्याने मंगल कार्यालयांचे मालक चिंतेत आहेत.