नंदुरबार : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत विस्तारलेल्या वनक्षेत्रात वनविभाग दरवर्षी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती करते. परंतु गेल्या वर्षातील कोरोनामुळे शासनाने निधीच न दिल्याने वनक्षेत्रातील पाणवठे होऊ शकलेले नाहीत. यंदाही निधी नसल्याने पाणवठे निर्मितीची प्रक्रिया लांबणार आहे.
साधारण ३४ हजार चाैरस किलोमीटर क्षेत्रात वनक्षेत्र विस्तारले आहे. यात बिबट्या, काळवीट, अस्वल, लांडगे, कोल्हे, ससे, मोर यासह विविध प्रकारचे वन्यप्राण्यांचा रहिवास आहे. या वन्यप्राण्यांच्या सोयीसाठी वनविभागाकडून त्या-त्या वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येतात. त्यातून उन्हाळ्यात वन्यप्राणी हे वनक्षेत्रातच थांबून राहत होते. परंतु गेल्या वर्षात पाणवठे निर्मितीची प्रक्रियाच झालेली नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा मेवासी, शहादा व नंदूरबार वनक्षेत्रातील बहुतांश नैसर्गिक पाणवठे हे मानवी वस्त्यांच्या जवळ आहेत. त्यातून वन्यप्राणी त्या पाणवठ्याकडे जाताना शेतशिवाराचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. यातून जिल्ह्यात वेळोवेळी शेतशिवारात हिंस्त्र व इतर वन्यप्राणी आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातून यंदा पाणवठ्यांसाठी निधी नसल्याने वन्यप्राण्यांच्या जलस्रोतांचे काय, असाही प्रश्न उपस्थित होते. वनविभागाने याबाबत राज्यशासनाला पाठपुरावा केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, कोविडमुळे केवळ वन्यप्राण्यांचे पाणवठेच नव्हे तर इतर कामांनाही खीळ बसल्याची माहिती आहे.
जुने पाणवठे शोधणार
नवीन पाणवठ्यांसाठी निधी नसल्याने वनविभागाचे कर्मचारी उपाययोजना म्हणून जुन्या पाणवठ्यांचे जिओ टॅगिंग पाहून त्यांची स्थिती जाणून घेणार आहेत. त्यानुसार त्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे.