लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नाही तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. यावर्षी पपईचा हंगाम सुरू झाला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. कोरोनाच्या धास्तीने व्यापारी आले नाहीत आणि जे आले त्यांच्याकडून मातीमोल भावात पपईची मागणी केली जात आहे. परिणामी दुष्काळात तेरावा महिना अशी गत बळीराजाची झाली आहे. जिल्ह्यात तापमानात अचानक वाढ झाली आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्यावर आहे. तापमानाचा पारा दुपारी १२ ते चार वाजेदरम्यान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस असतो. त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत आसल्याने ते काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. अनेक शेतकºयांनी पपईला योग्य भाव मिळत नसल्याने शेतातच ती खराब होत असल्याने नाईलाजाने पपईच्या शेतात रोटावेटर व कल्टीवेटर मारून पपईचे पिक शेतातून उखडून फेकले आहे.पपई पिकाचा शासनाने फळपीक योजनेत समावेश केला नसल्याने यास विम्याचे संरक्षण नाही. त्याचप्रमाणे हमीभाव नाही यामुळे व्यापारी प्रत्येक हंगामात शेतकºयांची दराबाबत फसवणूक करत असतात. दरवर्षी शेतकरी व व्यापारी यांच्यात पपईच्या दरावरून मोठा संघर्ष होतो. असे असतानाही जिल्ह्यात दरवर्षी पपई लागवड वाढत चालली आहे. नगदी पीक म्हणून शेतकºयांनी पपईच्या लागवडीवर भर दिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन घेतले जाते. मात्र त्याची विक्री परप्रांतीय व्यापाºयांच्या हातात असते. उत्तर भारतात थेट जम्मू-काश्मीरपर्यंत येथील पपईला सर्वाधिक मागणी आहे. परिणामी परप्रांतीय व्यापारी जो दर देतील तोच शेतकºयांना घ्यावा लागतो. गेल्या चार वर्षात पहिल्यांदा शेतकºयांना १४ रुपये दर यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला मिळाला होता. त्यानंतर व्यापाºयांनी एकजूट करून चार ते पाच रुपये प्रति किलो एवढा दर खाली आणला होता. असे असतानाही शेतकºयांनी पपईची तोड सुरू ठेवली होती. मात्र कोरोनाचे संकट उद्भवले आणि पपईची तोड थांबली.