नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून ते १४ एप्रिलपर्यंत जिल्हाअंतर्गत संपूर्ण लॅाकडाऊन जारी करण्यात आले होते. तर १५ एप्रिलपासून राज्य सरकारने लॅाकडाऊन जारी केले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात सलग दोन महिन्यांचे लॅाकडाऊन झाले आहे. परिणामी व्यापारी वर्ग पूर्र्णत: हवालदिल झाला असून दोन महिन्यापासून व्यवसाय नसल्याने हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे १ जून पासून लॅाकडाऊनमध्ये शिथीलता मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा घसरलेला ग्राफ लक्षात घेता लॅाकडाऊन नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथीलता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजनाला सुरूवात केली आहे.
व्यापारी संघटना सरसावल्या
गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापारी संघटना लॅाकडाऊन शिथीलतेच्या मागणीसाठी सरसावल्या आहेत. यापूर्वीच सर्व संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आता तालुकास्तरावर संघटना निवेदने देत आहेत. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढत चालला आहे. गेल्या आठवड्यात सर्व व्यापारी संघटना एकवटल्या होत्या. त्यांनी प्रशासनासमोर कैफियत मांडली होती.
भाजपचाही इशारा
भाजपने यापूर्वीच असहकाराचा इशारा दिला आहे. आता पुन्हा निवेदन देऊन सायंकाळपर्यंत व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॅाकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक कोलमडले आहेत. दुकानाचे भाडे, वीज बील यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना उभे करण्यासाठी राज्य शासनाकडे काहीही योजना नाही. किमान लॅाकडाऊन शिथील करून तरी त्यांना व्यावसायाची परवाणगी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात विजय चौधरी यांनी केली आहे.
निवेदनावर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी यांच्यासह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.