लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील विविध भागात बिबट्याच्या हल्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पाच दिवसात बिबट्याने केलेल्या तिसऱ्या हल्ल्यात शेळी फस्त केल्याची घटना घडली आहे. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामे केले असून, तत्काळ त्या बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.तळोदा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास भाजापाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार यांच्या काजीपुर-तलावडी शिवारातील शेतातील झोपडी जवळ बांधलेल्या शेळीवर हल्ला करून बाजुच्या शेतात ओढून नेले. शेतातील रखवालदार सुनील वसावे यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले, आपल्या कुटूंबातील सदस्यांना झोपडीत सुरक्षित बंद करून त्यांना तात्काळ शेत मालकास भ्रमणध्वनीद्वारे आपबीती कळविले. शेतमालक वनविभागाचे कर्मचाºयांची घटनास्थळी येऊन पाहणी केली. आठवड्याभरापूर्वीदेखील पहाटेच्या सुमारास याच ठिकाणाहून बिबट्याने एक शेळी फस्त केली होती.दोन दिवसापूर्वीदेखील धानोरा शिवारातील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बापू पाटील यांच्या शेतात उदमांजरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली तर गौरव वाणी यांच्या शेतातील पाळीव कुत्रा फस्त केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. त्याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी आला असून, पुन्हा एका पाळीव कुत्र्याला त्या बिबट्याने ओढून नेले. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहे. रात्रीच्या सुमारास दिसणारा बिबट्या दिवसा ढवळ्या हल्ले चढवत असल्याने शेतकरी, शेतमजूर व रखवालदार चांगलेच भयभीत झाले आहेत. वनविभागाने केवळ पाहणी करून कागदे रंगवण्यापेक्षा प्रत्यक्ष पिंजरा लावून त्या बिबट्यास जेरबंद करावे अथवा जीवितहानी होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
तळोदा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:15 IST