तळोदा : सुमारे १०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेला तळोदा येथील कालिकामातेचा यात्रोत्सव यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. गेल्यावर्षी प्रथमच यात्रोत्सवाची परंपरा खंडित झाली होती.
अक्षय तृतीयेला भरणारा हा यात्रोत्सव संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यात तळोदा शहर व तालुक्यातही रुग्ण आढळून येत होते. आजघडीला रुग्णसंख्या कमी असली, तरीही कोविड नियमांचे पालन होत असल्याने हा यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती तळोदा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरातील खरडी नदीच्या काठावर अक्कलकुवा रस्त्यावर श्री कालिकामातेचे छोटेसे मंदिर आहे. गावाच्या वेशीवर असलेली कालिकादेवी शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. यातून याठिकाणी दरवर्षी अक्षय तृतीयेला यात्रोत्सव भरविण्यात येतो. खरीप हंगामापूर्वी भरणारा हा यात्रोत्सव शेती अवजारे आणि बैल बाजार यासाठी प्रसिद्ध असल्याने याठिकाणी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल केवळ बैलजोड्या व शेतीसाठीच्या साहित्य विक्रीतून होत असल्याचे सांगण्यात येते. सोबत भांडी, कटलरी, खेळणी, खाद्यपदार्थ, मनोरंजनाची साधने यातून हा यात्रोत्सव तालुक्यातील जनतेसाठी आनंदोत्सव होत असतो. परंतु, गेल्यावर्षी लाॅकडाऊन आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती यामुळे यात्रा भरली नव्हती. अक्षय तृतीयेच्या दिवशी माेजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पूजन करण्यात येऊन गेल्यावर्षी यात्रोत्सव झाला होता. यावेळी काही भाविक नवस फेडण्यासाठी आले होते. दरम्यान, यंदाही याच पद्धतीने धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
खर्डी नदीकाठावर असलेल्या कालिकामातेच्या यात्रोत्सवासाठी दोन वर्षांपूर्वी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या मार्गदर्शनात नदीपात्राची स्वच्छता करून ते विस्तृत करण्यात आले होते. यातून भाविकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु, दोन वर्षांपासून यात्रोत्सव होत नसल्याने याठिकाणी पुन्हा गाळ व कचरा साचू लागल्याचे चित्र आहे.
याबाबत पालिका मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी सांगितले की, यात्रा भरविण्याबाबत शासनाचे आदेश नाहीत. शिवाय कोरोना संक्रमणाची भीती आहे. लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन सुरू आहे. यामुळे यावर्षीही तळोद्यातील पारंपरिक कालिकामातेचा यात्रोत्सव होणार नाही. यामुळे भाविक व व्यावसायिकांनी यंदाही घरीच राहावे.