तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस.बी. खर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी तळोदा तालुक्यातील पाच ग्रामसेवकांच्या तालुक्याअंतर्गत बदल्या केल्या होत्या. या प्रकरणी काही पदाधिकाऱ्यांनी आपले सरकार पोर्टलवर जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून बदल्यांचा अहवाल मागवला होता. या अहवालात त्यांनी शासनाने केलेल्या सर्वसाधारण बदल्यांची माहिती देऊन दिशाभूल केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाय ज्या ग्रामसेवकाबद्दल पदाधिकाऱ्यांची तक्रार होती, अशा ग्रामसेवकांची चौकशी करून तसा अहवाल इकडे सादर करण्याचा देखील शासनाच्या नियम आहे. परंतु त्या नियमाचे उल्लंघन करून अधिकार नसताना बेकायदेशीर बदल्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गटविकास अधिकारी खर्डे यांना जिल्हा परिषद प्रशासनाने २१ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच तीन दिवसात आपले म्हणणे सादर करून तसा खुलासा कार्यालयात पाठवण्याची सूचना त्यांना केली होती. मात्र तीन दिवसानंतरही अजून खुलासा जिल्हा परिषद प्रशासनाकडे आला नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार शिसतभंगाची कार्यवाहीकरिता नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठवणार असल्याचे, ते म्हणाले आहे. त्यांनी म्हणणे सदर न केल्यामुळे बेकायदेशीर बदल्या केल्याचा ठपका त्यांना मान्य असेल असा निष्कर्ष निघतो, असेही ते म्हणाले. आता पुढील काय कार्यवाही होते की, सारवासारव केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
कोट.....
तळोदा तालुक्यातील ग्रामसेवकांच्या शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर गटविकास अधिकारी एस.बी. खर्डे याना नोटीस बजावली होती. तीन दिवसात म्हणणे सादर करण्याची संधीदेखील त्यांना देण्यात आली. होती. परंतु अजूनही त्यांनी म्हणणे आमच्याकडे सादर केलेले नाही. यामुळे त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल.
-शेखर रौंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार