लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील दोन राज्य सिमा तपासणी नाक्यांवर पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे़ पोलीस, आरोग्य विभाग आणि आरटीओचे हे पथक येणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रवाशांची चाचणी करुन जिल्ह्यात प्रवेश देणार आहेत़जगात कोरोनाची भिषणता वाढली असल्याने देशासह राज्यात उपाययोजना गांभिर्याने राबवल्या जात आहेत़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासनही दक्ष असून जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी शुक्रवारी बेडकी ता़ नवापुर आणि गव्हाळी ता़ अक्कलकुवा येथील सीमा तपासणी नाक्यांवर बाहेरुन येणाºया प्रवाशांची तपासणी करुन मगच जिल्ह्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी जिल्हा पोलीस दल, जिल्हा आरोग्य विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांचे पथक निर्माण करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ २४ तास दोन्ही ठिकाणी पथक नियुक्त करुन त्यांच्या निगराणीखाली वाहनांची तपासणी होणार आहे़ यात एखादा वाहनचालक, प्रवासी याची प्रकृती खराब असल्यास किंवा त्यांच्या कोरोनाची संभावित लक्षणे असल्यास तातडीने त्यांना विसरवाडी, नवापुर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत़या निर्णयासाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली असून शनिवारपासून दोन्ही ठिकाणी पथक नियुक्त होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे़दरम्यान जिल्ह्यात या दोन ठिकाणांव्यतिरिक्त गुजरात राज्यातून येणारे इतरही अनेक मार्ग आहेत़ तसेच जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश आणि धुळे जिल्ह्याची सिमा आहे़ परंतू तूर्तास या गुजरात सिमेवरील दोन्ही राज्य सिमा तपासणी नाक्यांवर पथक नियुक्त होणार असून येत्या काळात गरज भासल्यास जिल्ह्याच्या चारही बाजूच्या सिमा सील करुन सर्वच ठिकाणी तपासणी पथक निर्माण होऊ शकतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़
जिल्ह्याच्या सिमेवरच होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:23 IST